इतिहास

मळगांव हे गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पासून पश्चिमेकडे 6 किलो मीटर अंतरावर वसलेले आहे. या गांवातील मुंबईमध्ये नोकरी धंद्याच्या निमित्ताने गेलेल्या लोकांनी 1941 मध्ये मुंबईमध्ये मळगांव ऐक्यवर्धक संघ, मुंबई या नांवाने कै. श्री. राजाराम लक्ष्मण नाईक यांचा नेतृत्वाखाली संघाची स्थापना केली. त्यावेळी त्यांची अशी भावना होती की, मळगांवचा विकास होण्यासाठी मळगांव गांवात सोय व्हावयास हवी. संघाचे कार्यकर्ते फार शिकलेले होते असे नाही. परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव होती की गांवाचा विकास होण्यासाठी आपल्या गावांतील मुलांनी शिक्षण घेऊन पुढे आले पाहिजे. त्यामुळे आपल्या असलेल्या प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी शालेय फी, पुस्तके, वह्या, कपडे इत्यादिसाठी आर्थिक मदत संस्थेमार्फत केली जात असे.

स्वातंत्र्योतर काळात मुंबई सार्वजनिक न्याय कायदा 1951 (Bombay public trust act ) नुसार 25 मे 1953 रोजी मळगांव ऐक्यवर्धक संघ, मुंबई रजिस्टर करण्यात आला. गांवात 7 वी नंतरचे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी सावंतवाडी येथे जावे लागत असे. त्यामुळे 7 वी नंतरचे माध्यमिक शिक्षण घेणार्‍या मुलांची संख्या अगदी कमी होती व त्यामुळे बहुसंख्य मुले विशेषता सर्वच मुली 7 वी नंतर शिक्षणापासून वंचित राहत असत. हा अनुभव लक्षात घेऊन संस्थेने गांवात 13 जून 1960 रोजी मळगांव इंग्लिश स्कूल या नांवाने माध्यमिक शाळा सुरू केली. मळगाव पंचक्रोशीतील निरवडे, वेत्ये, सोनूर्ली, न्हावेली, नेमळे या गांवात माध्यमिक शाळा नसल्यामुळे त्या गांवातील मुलांसाठी मळगांव मधील माध्यमिक शाळेची सोय झाली. सुरूवातीला शाळेचे वर्ग रस्तावाडी मधील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत सूर्याजी खानोलकर यांच्या घरात (मांगरात) बसविले जात असत. संस्थेचे कार्यकर्ते मुंबई मध्ये राहत असल्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाकरीता संस्थेचे श्री. प्रभाकर रावजी मळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली एक स्थानिक सब कमिटी नेमली. सुरवातीच्या काळात शाळा चालविण्यात अनंत अडचणी असल्यातरी श्री. मळगांवकर यांनी प्रसंगी आर्थिक अडचणी सोसूनही संस्थेस शाळा चालविण्यास मोलाची मदत केली.

गांवातील व पंचक्रोशीतील विद्याथ्यांची संख्या सतत वाढू लागल्याने शाळेसाठी स्वतंत्र इमारतीची आवश्यकता भासू लागली. या गोष्टीचा संस्थेने गांभीर्याने विचार करून त्या वेळेचे गांवाचे सरपंच श्री. रमाकांत सूर्याजी खानोलकर यांची स्थानिक सब कमिटी चेअरमन म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सन 1965 मध्ये गावकर्‍यांनी शाळेसाठी पाच खोल्यांची इमारत बांधली. गांवातील जमीनदार श्री. अनंत शंकर सबनीस व श्री. बाबलो रामा गोसावी यांनी आपली जमीन मळगांव इंग्लिश स्कूलच्या इमारतीच्या बांधकामासाठी बक्षीस पत्राने मोफत दिली. शाळेच्या बांधकामा साठी कुंभार औद्योगिक सहकारी संस्था, फॉरेस्ट कॉंन्ट्रॅक्टर श्री. डोंगरे, श्री. आदम करोल, सावंतवाडीचे दादासाहेब भांगले व ठेकेदार श्री. देशपांडे यांचे बहुमोल्य सहाय्य लाभले तसेच पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी वीटा, लाकूड सामान, कौले इत्यादींची मदत दिली. मळगांव मधील माळीचे घर व इतर ग्रामस्थांनी श्रमदान करून शाळेच्या बांधकामास मोलाचे सहकार्य केले.

त्या काळात खाजगी माध्यमिक शाळांना शासकीय अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे शाळेला लायक असे पदवीधर शिक्षक मिळणे अवघड होत असे. शिक्षक मिळाला तरी अन्यत्र संधी उपलब्ध झाल्यावर ते शाळा सोडून जात होते. अशा परिस्थितित जून 1966 मध्ये श्री. गजानन गंगाराम भागवत (एम.ए.एम.एड.) यांना संस्थेने मुख्याध्यापक म्हणून नियुक्त केले. श्री. भागवत सर यांनी शाळेमध्ये अत्यंत सेवाभावी वृतीने शालेय कामकाज करून शाळा नांवारूपास आणली. श्री. भागवत सर सेवानिवृत झाल्यावर त्यांच्या एकूण कार्याची संस्थेने नोंद घेऊन त्यांच्या अनुभवाचा संस्थेला लाभ व्हावा. यासाठी संस्थेने त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी फेब्रु. 2011 पर्यंत समर्थपणे सांभाळली.

संस्था व शाळा यांचा दैनदिन संपर्क साधण्यासाठी संस्थेने स्थानिक सचिव म्हणून श्री. राधाकृष्ण शांताराम नाटेकर यांची नियुक्ती केली. श्री. नाटेकर यांनी स्थानीक सचिव म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यानंतर स्थानिक सचिव म्हणून श्री. महादेव सगुण सोनुर्लेकर यांनी फेब्रु. 2011 पर्यन्त काम पाहिले. फेब्रु. 2011 च्या सर्वसाधारण सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व स्थानिक सचिव ही दोन्ही पदे रद्द करण्यात आली.

1972 मध्ये शिक्षक वर्गाने माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने दोन वर्गखोल्या बांधल्या. या कामी वेत्ये येथील निवृत्त शिक्षणाधिकारी कै. श्री. शी. ल. सामंत तथा काका मास्तर यांचे मोलाचे सहाय्य लाभले. दत्तात्रय शंकर नाडकर्णी व बंधु, दादर, मुंबई यांचे कडून प्राप्त झालेल्या रुपये 15000/- देणगीतून एका वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात आले. 1967 मध्ये शासनाच्या संचयनीबचत योजनेमध्ये शाळा सहभागी होऊन शाळेतील सर्व विद्यार्थी बचत योजनेमध्ये सामील झाले. शासनामार्फत शाळेला बचत स्कूल म्हणून जाहीर करण्यात आले. शाळेला प्रोत्साहनपर अनुदान रुपये 5000/- परितोषिक म्हणून मिळाले. त्यात संस्थेने रुपये 35000/- जमा करून 1991 मध्ये अल्पबचत विज्ञान हॉलचे बांधकाम केले. संस्थेने याच काळात 7 खोल्या बांधून पूर्ण केल्या. कै. श्री. वामन कांबळी यांनी आपले वडील कै. वसंत भगवंत कांबळी याच्या स्मरणार्थ दिलेल्या रुपये 10111 /- देणगी तून रंगमंच उभारण्यात आला. श्री. भिकाजी राजाराम खानोलकर ( आबा रायकर ) आणि बंधु यांच्याकडून मिळालेल्या रुपये 31000/- देणगीतून इमारतीच्या दर्शनी भागात राजाराम सभागृह बांधून शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्यात आली. म्हापसा येथील शरदराव झारापकर आणि बंधु यांनी आपले वडील श्री. जनार्दन उर्फ बाळ दत्ताराम झारापकर यांच्या स्मरणार्थ रुपये 15000/- इमारत बांधकामास देणगी देऊन उपकृत केले आहे. सन 1998 मध्ये डॉ. लिओ ब्रान्स, मुंबई. यांचे कडून रुपये 5,00,000/- देणगी मिळाली. ही मदत मिळविण्यासाठी कै. श्री विजय पंतवालावलकर यांनी विशेष प्रयत्न केले तसेच श्री. प्रकाश सबनीस यांनी त्याचा पाठपुरावा केला, यातून संस्थेने चार खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. या वास्तूचे डॉं. लिओ बार्न्स विस्तार भवन असे नामकरण करण्यात आले आहे.

याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्याने शाळेला व्यायामशाळा बांधण्यासाठी रुपये 1,00,000/- देणगी दिली. व्यायामशाळा बांधकामाचा प्रकल्प रुपये 1,85,000/- खर्चाचा असून उर्वरित रक्कम लोक वर्गणीतून वस्तु व श्रमदानसेवेमार्फत जमा करून व्यायामशाळेची इमारत बांधण्यात आली आहे. तसेच सावंतवाडीचे मेसर्स भारत ट्रेडिंग कंपनीचे मालक श्री. रावजी मोहन पंतवालावलकर यांनी कै. पूज्य पिताजी मोहन हरी पंतवालावलकर यांच्या स्मृत्यर्थ शाळेच्या प्रवेशव्दारावरील लोखंडी फाटक बनविण्यासाठी रुपये 7000/- देणगी दिली.

1973 सालापासून 5 वी ते 7 वी चे वर्ग माध्यमिक शाळांना सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्याचा फायदा घेऊन 1973-74 मध्ये पाचवी, 1974-75 मध्ये सहावी व 1975-1976 मध्ये सातवीचा वर्ग शाळेला मिळाल्यामुळे या शाळेत पाचवी ते अकरावी वर्ग सुरू करण्यात आले. परंतु शासनाचा 10/02/3 या शैक्षणिक धोरणामुळे जून 1975 पासून 11 वी चा वर्ग बंद झाला. त्यामुळे शाळा 5 वी ते 10 वी वर्गापर्यंत झाली. मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव ही माध्यमिक शाळा शासकीय अनुदानावर चालणारी शासनमान्य माध्यमिक शाळा आहे.

1989-90 या शैक्षणिक वर्षापासून या शाळेमध्ये शालांत परीक्षा केंद्र सुरू झाले. या केंद्रावर पंचक्रोशीतील 5 माध्यमिक शाळांची सुमारे 450 मुले दरवर्षी शालांत परीक्षेला प्रवीष्ट होतात.

शाळेमध्ये येणारी मुले दूर अंतरावरून येणारी असल्यामुळे त्यांना दुपारच्या वेळी पूरक आहार मिळावा, म्हणून संस्थेने 1986 सालापासून पेज योजना सुरू करून मुलांना पेज देण्याची सोय केली. दुपारच्यावेळी जी मुले जेवणाला घरी जात नाहीत, ती सर्व मुले या पेज योजनेचा लाभ घेतात तसेच सुरुवातीचा काळात गांवामध्ये फिरून पेज योजनेसाठी गांवातील लोकांकडून भात जमा करण्यांत येत असे. अनेक दानशूर व्यक्तींनी निधि उपलब्ध करून दिला असून, हा सर्व निधि बॅंकेमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यावर मिळणार्‍या व्याजातून पेज योजनेसाठी खर्च केला जातो. तसेच पेज योजने मध्ये रुपये 1,00,000,/- कायम ठेव म्हणून ठेवली आहे. शासनाकडून इ 5 वी ते 8 वी च्या मुलांना पोषण आहार दिला जातो. त्यात आपल्या शाळेतील पेज योजनेतून 9 वी ते 10 वीच्या मुलांना पोषण आहार घेण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आज आपल्या शाळेत सर्व मुलांना पोषण आहार दिला जातो. सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये संस्थेच्या पेज योजनेमधील सुमारे रुपये 90,000/- खर्च करून पोषण आहार शिजविण्यासाठी अन्नपूर्णा हॉल (स्वयंपाक घर ) बांधण्यात आले असून त्याचा वापर सुरू आहे.

शाळेतील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक निधी उभारण्यात आला. अनेक लोकांनी विविध विषयांसाठी 5 वी ते 10 वीच्या मुलांना पारितोषिके देण्यासाठी देणग्या दिल्या आहेत. पारितोषिक निधीमध्ये रुपये 75000/- कायम ठेव म्हणून ठेवण्यात आली असून त्या रक्कमेवर दरवर्षी मिळणार्‍या व्याजाच्या रकमेतून पारितोषिके दिली जातात. या शिवाय मळगांव गावचे रहिवाशी कै. गुरूनाथ पाटकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी रुपये 88,300/- संस्थेकडे दिले असून ही रक्कम बॅंकेमध्ये कायमठेव म्हणून ठेवण्यात आली असून त्या रक्कमेवर दरवर्षी मिळणार्‍या व्याजाच्या रक्कमेतून दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर शाळेतील गरजू व गरीब मुलांना शालोपयोगी वस्तु तसेच गणवेशांचे समारंभपूर्वक वाटप केले जाते. यापैकी रुपये 1500/- दरवर्षी केंद्र शाळा मळगांव येथील गरजू व गरीब मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यासाठी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिले जातात. जून 2007 पासून इंग्रजी माध्यमांचे प्ले स्कूल व केजी स्कूल रेन्बोस्कूल या नावाने सुरू केले असून इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

संस्थेने नेहमीच काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेला कला व विज्ञान शाखेचे उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शासनाने विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानुसार 2008 पासून 11 वी चा विज्ञान शाखेचा वर्ग सुरू करण्यात आला. तसेच 11 वी कला वर्गाला मान्यता मिळेल असे गृहीत धरून 11 वी कला वर्ग सुरू करण्यात आला. परंतु शासनकडून 11 वी कला शाखेच्या वर्गाला मान्यता मिळू शकली नाही. दोन वर्ष विना मान्यता व विना अनुदानित वर्ग चालवून शासनाच्या निर्वाणीच्या आदेशानुसर कला शाखेचे 11 वी, 12 वी चे वर्ग बंद करण्यात आले. तसेच जून 2010 पासून विद्यार्थी संख्ये अभावी विज्ञान शाखेचे वर्ग बंद करण्यात आले. विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यास संस्थेला शासनाची मान्यता आहे. ती मान्यता बदलून कला व वाणिज्य संयुक्त शाखा सुरू करण्यास परवागीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

शाळेमध्ये 5 वी ते 10 वीच्या विद्यार्ध्यासाठी संगणक प्रशिक्षण देण्याची सोय केली असून स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. पुढील विविध दानशूर व्यक्ति व आमदार निधीतून 21 संगणक आमच्या शाळेसाठी उपलब्ध झाले आहेत. (1) श्री. सातार्डेकर नम्रता 1, (2) खासदार सुधीर सावंत 1, (3) आमदार गुरूनाथ कुलकर्णी 1, (4) आमदार शिवराम दळवी 1, (5) एम. जी. टी. फाऊंडेशन कुडाळ 4, (6) दीपा मिरीकर 2, (7) इन्फोसिस पुणे 4, (8) सर्व शिक्षा अभियान 2, (9) पराग मणेरीकर 1, (10) विश्वनाथ गजानन सामंत 1 आणि (11) संस्था खरेदी 3, संस्थेने संगणक शिक्षण देण्यासाठी स्वखर्चाने कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. शाळेमध्ये संगणक शिक्षणातील प्रगत शिक्षणाचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत.

शाळेचा शालांत परीक्षा निकाल गेल्या 10 वर्षात 80 टक्के हून अधिक आहे. तसेच 90 टक्केहून अधिक गुण मिळण्यार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 10 टक्के आहे. शाळेमध्ये 18 शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. मार्च 2018 च्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याने 98 टक्के गुण मिळून शाळेमध्ये इतिहास घडविला आहे.

आपल्या शाळेचे अनेक विद्यार्थी देशात व परदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी वकील, डॉक्टर्स, इंजिनियरर्स तसेच शासकीय सेवेमध्ये वरच्या हुद्दयावर कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी समाजसेवा व राजकारणात असून आपल्या भागाचा म्हणजेच आपल्या देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान देत आहेत. अनेक विद्यार्थी उद्योगधंदयामध्येही नांव कमावून आहेत. आम्हाला या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान आहे.

कालपरत्वे वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे व विविध शैक्षणिक उपक्रमामुळे शाळेतील पायाभूत सुविधा अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे शाळेचा भविष्यकालीन योजनांचे व गरजांचे नियोजन करून बृहुत आराखडा तयार करण्यात आला आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने स्मरणिकेव्दारे निधि संकलन करण्यात आला. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी व सांगता समारंभावेळी ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. आतापर्यंत जमा झालेल्या निधीतून लिओ बार्न्स विस्तारीत इमारतीवर चार वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून त्या वर्ग खोल्यांचा वापर जून 2011 पासून करण्यात येत आहे. अजूनही मोठा टप्पा गाठायचा आहे. दानशूर व्यक्ती तसेच शाळेचे माजी विद्यार्थी यांनी शाळेला भेट देऊन शाळेचे कामकाज पाहून व शाळेच्या गरजा लक्षात घेऊन सढळ हस्ते आर्थिक योगदान द्यावे अशी नम्र अपेक्षा आहे. सर्वाच्या सहकार्यातून शाळेच्या सर्व गरजा पूर्ण होतील अशी आमची खात्री आहे.

आपण आपली देणगी मळगांव ऐक्यवर्धक संघ, मुंबई या नांवाने पाठवावी. आपली देणगी 80 जी खाली कर सवलतीस पात्र आहे.